Tuesday, July 20, 2010

अग्रलेख

- आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

('वासूनाका' प्रसिद्ध झाल्यानंतर आचार्य अत्र्यांनी दै. मराठामध्ये पुस्तकावर टीका करणारा अग्रलेख लिहिला. ह्या गाजलेल्या आणि पुस्तकाला 'गाजवणाऱ्या' अग्रलेखातला इथे प्रसिद्ध होतोय तो मजकूर 'वासूनाका सांगोपांग' ह्या डिंपल पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या आणि वसंत शिरवाडकरांनी संपादित केलेल्या पुस्तकातून घेतला आहे, त्यात अग्रलेखाचं शीर्षक दिलेले नाही, त्यामुळे पोस्टला नुसतं 'अग्रलेख' असंच म्हटलंय.
मूळ अग्रलेखाबरोबर भाऊंचा एक फोटो छापला होता, तो इथे दिलेला नाहीये, त्यामुळे त्या फोटोच्या संदर्भात अग्रलेखाची सुरुवात आहे हे समजून घ्यावे.)

हा बाजूला ज्याच्या चित्राचा ठसा आम्ही छापलेला आहे ना, त्याचे नाव प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये. त्याच्या चेहेऱ्यावरून तो चांगलाच मवाली दिसतोय. वासूनाका नावाचा एक कथासंग्रह लिहून ह्या इसमाने मराठी वाङ्मयात जी बीभत्स आणि गलिच्छ डाकूगिरी केलेली आहे, तिला तोड नाही. अशा तऱ्हेच्या हिडीस मवालगिरीला मराठी साहित्यात रथचक्रचे कर्ते श्री. ना. पेंडसे, चक्र बनविणारे जयवंत दळवी, माणूसचे लेखक मनोहर तल्हार, बाईविना बुवा बनलेले उद्धव शेळके आणि कोसलाचे निर्माते भालचंद्र नेमाडे ह्यांनी यापूर्वीच सुरुवात केलेली आहे. तथापि ह्या हिडिस बीभत्सपणावर जर सर्वांत कोणी किळसवाणा कळस चढविला असेल, तर तो भाऊ पाध्ये ह्याच्या वासूनाकाने. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अमृताशी पैजा जिंकणारी आमची मराठी भाषा निर्माण केल्यानंतर गेल्या सात शतकांत ह्या मराठी भाषेत चांगले वाईट लिखाण करणारे पुष्कळ लेखक अन् कवी होऊन गेले. पण भाऊ पाध्ये ह्याच्यासारखा घाणेरडा कागदखराब्या ह्या महाराष्ट्रभूमीत आजपर्यंत कधई जन्माला आला नसेल. ह्याचा जन्म आपल्या मातेच्या कुशीत झालेला नसून, कोठल्या तरी बावनखणीच्या वा फोरास रोडच्या गटारात झाला असला पाहिजे, ह्याबद्दल आता आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. संडासात आपली लेखणी बुडवून भाऊ पाध्याने जेव्हा हे भयानक वासूनाका लिहिले, तेव्हा त्याची बोटे महारोगाने का झडली नाहीत किंवा त्याच्या मेंदूला कॅन्सर का झाला नाही, असे ते चोपडे वाचताना वाचकांना वाटू लागते. वासूनाका लिहिणाऱ्या लेखकाला आई नसावी. बहीण नसावी. बायको नसावी किंवा मुलगी नसावी असे वाटते. कारण, असे जवळच्या जिव्हाळ्याचे कोणी नातेवाईक त्याला जर असते, तर धंदेवाईक वेश्यांच्या दुकानांतसुद्धा जी भाषा त्यांच्या गिऱ्हाईकांना उच्चारण्याचे कधी धाडस होणार नाही, असा गटारबोलीत वासूनाका लिहिण्याचे धैर्य ह्या भाऊ पाध्याला कदापि झाले नसते. आम्हाला गंमत वाटते ती ही, की हा भाऊ पाध्ये पूर्वी साधारण बऱ्यापैकी लेखक होता. त्याने आमच्याकडेही पूर्वी थोडेसे लेखन केलेले आहे. आम्ही त्याला कधी पाहिले नसले किंवा त्याची व्यक्तिगत अशी काहीही माहिती आम्हाला जरी नसली, तरी आम्हाला परिचित असलेल्या त्याच्या पत्नीला तिच्या पहिल्या बाळंतपणासाठी आम्ही स्वतः दीडशे रुपयांची मदत केलेली आहे. तोच भाऊ पाध्ये कालांतराने ज्ञानेश्वराच्या अमृतमधुर मराठी भाषेत मांजराचे मूत्र आणि कुत्र्याची विष्ठा कालवील असा त्यावेळी आम्हाला सुतराम् देखील संशय आला नाही. वासूनाका ह्या चोपड्याच्या अस्तित्वाची आम्हाला कालपरवापर्यंत जाणीवदेखील नव्हती. पण राजश्री मासिकाने त्या चोपड्यातील गलिच्छपणा आपल्या एका अंकात उघडकीस आणल्यानंतर, त्याकडे आमचे लक्ष वेधले. तेव्हा ताबडतोब आम्ही वासूनाका मागवून तासाभरात घाईघाईने ते वाचून टाकले. ते वाचून आमच्या सर्वांगाचा भडका उडाला. आमच्या निकटच्या मित्रमंडळींना त्यातले काही उतारे जेव्हा आम्ही वाचून दाखविले, तेव्हा ते तर हतबुद्ध झाले. ते उद्गारले, अशा तऱ्हेचे गलिच्छ पुस्तक मराठी भाषेत प्रसिद्ध कसे होऊ शकते?’ आम्ही त्यांना सांगितले की, अहो, भाऊ पाध्यासारख्या फोरास रोडवरच्या एखाद्या भडव्याने मराठी भाषेत काय वाटेल तो मात्रागमनीपणा केला असेल. पण ते बेवारशी पाप मुंबईच्या पॉप्युलर प्रकाशनसारख्या नामवंत आणि प्रतिष्ठित प्रकाशनकाने आपल्या अंगाखांद्यावर खेळवून लोकांच्या हाती ठेवण्याचा बेजबाबदार पागलपणा काय म्हणून करावा? भरबाजारात देहविक्रिय करणाऱ्या धंदेवाईक वेश्येला कुटुंबवत्सल गृहस्थाने आपल्या घरात हळदीकुंकवाला वा सत्यनारायणाला काय म्हणून बोलवावे? आमचे वाचक आम्हांला विचारतील की तुम्ही वासूनाका हे चोपडे हिडीस आहे, गलिच्छ आहे, बीभत्स आहे, असे घसा खरडून आतापर्यंत या अग्रलेखात जे सांगितलेत, त्याचा एखादा काही तरी पुरावा द्या की! तर त्याबाबत आम्हाला एवढेच सांगावयाचे आहे की ह्या वासूनाक्यातला काही बीभत्स भाग इतका हिडीस आणि गलिच्छ आहे की त्याचा सामान्य नामनिर्देश देशील करणे आम्हाला शक्य नाही. स्त्री जातीच्या शरीराच्या सर्व अंगोपांगाची आणि तिच्याशी होणाऱ्या पुरुषसंबंधांची साद्यंत वर्णने कधी एखाद्या शब्दात, एखाद्या वाक्यात वा टप्प्यात पुनःपुन्हा मिटक्या मारीत ह्या भाऊ पाध्याने केलेली आहेत. आई आणि बहीण ह्यांच्या संदर्भातल्या हिडीस शिव्यांची तर समग्र पुस्तकात खैरात केलेली आहे. भ्यांचोद, मादरचोद, आणि च्यायला ह्या शिव्या वाक्या वाक्यागणिक लेखकाने उधळलेल्या आहेत. भ्यांचोद ही शिवी तर आम्ही ह्या पुस्तकात दीडशे वेळा मोजली. अन् च्यायला सव्वाशे वेळा. ती मुलगी बारा ** ची आहे, तिचा ** फारच भरलेला किंवा टरारला होता, (फुल्या आमच्या). असली या चोपड्यातली महाबीभत्स शिमगा वाक्ये वाचताना वाचकांच्या माना शरमेने खाली मोडून पडतील आणि त्यांच्या मनात असाही विचार येऊन जाईल की ती वाक्ये भाऊ पाध्येच्या कुटुंबातील स्त्रियांच्या संदर्भाने कोणी तरी वापरावीत. हे चोपडे वाचून आमच्या सर्वांगाचा असा काही भटका उडाला की, केशवसुतांच्या जन्मोत्सव सभेत बोलताना ह्या भाऊ पाध्याला जोड्याने मारावयाला पाहिजे, असे आम्ही संतापाने म्हणालो. तेव्हा भाऊ पाध्येचे काही पाठीराखे त्याच्या मदतीला मोठ्या हिरीरीने धावून आले हे पाहून आम्हांला खरोखरच त्यांची कीव आली. भाऊ पाध्यांचे हे समर्थक काही सामान्य साहित्यिक नाहीत. मराठी साहित्यात ज्यांनी नावलौकिक आणि प्रतिष्ठा मिळवलेली आहे असे ते वजनदार आणि जबाबदार लोक आहेत. त्यांची नावेच सांगितली तरी पुरे. दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर आणि वसंत शिरवाडकर, ह्यांनी अनुक्रमे अभिरुची, महाराष्ट्र टाईम्स आणि वीणा ह्या नियतकालिकांत हा हिडीस वासूनाका अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचविलेला आहे. दुर्गा भागवत ह्या तर मराठी भाषेतल्या नामांकित लेखिका आहेत. अभिजात आणि शैलीदार लेखन करण्यात त्यांचा हात धरणारे मराठीत फारच थोडे लेखक किंवा लेखिका सापडतील. असे असून त्यांनी वासूनाकाची विष्ठा चिवडून चिवडून त्यातून एक गंधर्वसृष्टी शोधून काढली आहे. वासूनाक्यातल्या सर्व कथा पोरवयातच बिघडलेल्या माणसांच्या अतृप्त लैंगिक वासनेच्या आहेत. वासनेच्या भुकेचे बळी आहेत सारे. ते लोक उंडगे म्हणजे मनाचे दुबळे आहेत. ते दारूडे, व्यसनी व बीभत्स चलनी भाषा बोलणारे आणि लोकांची टिर्रेबाजी करणारे आहेत, असे कबूल करूनही दुर्गाबाईंनी, ह्या गुंडांच्या मनात स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल फार मोठा आदर असून तरुण, सौंदर्य, चारित्र्य व प्रेमळपणा या चार गुणांचा साज ह्या मवाल्यांनी आपल्याला मनातून पूज्य वाटणाऱ्या स्त्रीच्याभोवती चढविलेला आहे, असा अजब शोध लावलेला आहे. वस्तुतः कोणीही सभ्य आणि सुसंस्कृत स्त्री हे वासूनाका चोपडे हातातसुद्धा धरणार नाही. पण ज्याअर्थी गटाराच्या घाणीत कोपरापर्यंत हात बुडवून दुर्गाबाई तो आपल्या नाकाजवळ नेऊन हुंगीत आहेत आणि हाताला गुलाबाचा वास येत असल्याचे त्या सोंग करीत आहेत, त्या अर्थी स्वरूपाच्या अभावामुळे दीर्घकालीन अविवाहित स्थितीत राहाणे आजपर्यंत त्यांना भागच पडल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या मनात भलभलते अविचार सध्या येत असावेत आणि त्यामुळे त्यांच्या बुद्धीचा, भावनेचा आणि अभिरुचीचा तोल ढळला असावा, असा तर्क करणे क्रमप्राप्त आहे. दुर्गाबाईंपेक्षा अधिक पोटतिडकीने तेंडुलकर ह्यांनी वासूनाक्याचे समर्थन केले आहे. त्यांनी वासूनाक्यातील काही नमुनेच आपल्या समालोचनात दिले आहेत. त्यातले काही नमुने येथे देण्यासारखे आहेत. १) उन्हे उतरली म्हणजे आमची कंपनी वुलन पँटस् चढवून वासूनाक्यावर भंकसगिरी करायला जमत होती. आम्हाला च्यायला मधुबालेसारखी पणती पकडणे शक्य आहे का?’ २) परवा संक्रांतीची गोष्ट. सकाळी तिचा भाऊ तिळगूळ घेऊन आला. त्याने मला चिठ्ठी दिली. भ्यांचोद काय काय लिहिलं होतं त्यांत! काय म्हणे मला फक्त तुम्ही हवेत. दुसरे कोणी नको! भ्यांचोद काय ती बडबडते!’ ३) साला हिच्याबरोबर दोन घंटे टाईमपास होतो आहे ना! ही सगळी हिरव्या नोटेची पावर!’
हे तीन उतारे वाचले म्हणजे वासूनाक्यामधील गुंडांना स्त्रीच्या इज्जतीबद्दल विलक्षण आदर वाटतो आणि त्यामुळे ह्या सर्व वर्णनात हृदयस्पर्शी उद्विग्नता वाटते असा शोध लावणाऱ्या विजय तेंडुलकरांचे डोके ठाणे येरवड्याच्या तज्ज्ञ डॉक्टरकरडून तपासून घ्यावे असेच वाटल्यावाचून राहणार नाही. वसंत शिरवाडकरांनी त्याच्यापुढे जाऊन वासूनाक्यातील गलिच्छ भाषेचे आणि अश्लीलतेचे बेशरमपणे समर्थन केले आहे. ते म्हणतात, ‘‘बकाल जीवनाचे प्रत्यंतर घडविण्यासाठी लेखकाने जर पांढरपेशी सुसंस्कृत भाषेचे माध्यम वापरले असते, तर त्याच्या आशयाचा अस्सलपणाच तो हरवून बसला असता. या बकाल बोलीत अर्वाच्यता भरपूर असली तरी तिचेही एक सामर्थ्य आहे. वासूनाक्यावरील बकाल जीवन (जे लेखकाने चितारले आहे) ते खरे आहे. आणि ते खरे असल्याचे तुम्हाला शंभर टक्के जाणवावे म्हणून लेखकाने ते तेथील चालू बोलीतून तुम्हाला सांगितलेले आहे. त्याची ही सत्यता हेच त्याचे समर्थन आणि तेच त्याचे आव्हान. वासूनाक्यात आचरट किंवा अश्लिल काही नाही. त्यात जे बीभत्स दिसते, ते काही लेखकाच्या डोक्यातले नाही. ते त्याच्या वर्ण्य विषय असलेल्या जीवना आहे. त्या जीवनात तसे असेल, आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही, आम्हाला ते पहावयाचेही नाही असा विश्वामित्री आविर्भाव ज्यांचा असेल त्यांच्याशी या मुद्द्याबाबत वाद घालणे व्यर्थच आहे!’’ वाङ्मय म्हणजे काय, वाङ्मयात भाषेचे स्थान काय किंवा वाङ्मयातील वास्तववादाचे स्वरूप आणि व्याप्ती काय असावी, ह्याची सुतराम माहिती नसलेल्या वसंत शिरवाडकरासारख्या एका मूर्ख, अडाणी आणि वेडगळ माणसाशी काय वाद घालावा?
फायनॅन्शल एक्सप्रेसमधे जे-वॉकर ह्या नावाने (कोणी आम्हांला सांगितले की अडाणेश्वर नावाचे मराठी लेखकच आहेत.) एका लेखकाने व्यक्तिशः आमच्याविरुद्ध हंबरडा फोडला आहे, की भाऊ पाध्येसारख्या युगप्रवर्तक (Epochmaking) कादंबरीकाराविरुद्ध लोकमत प्रक्षुब्ध करून आणि सरकारी कायद्याला चिथावून अत्रे हे त्यांचा निष्कारण बळी घेण्याच्या प्रयत्नात आहेत!’ म्हणून त्यांचे लोकांना असे आवाहन आहे की, त्यांनी वासूनाक्याकडे कलात्मक आणि वाङ्मयीन दृष्टीने पाहावे आणि सरकारला त्यांचे असे सांगणे आहे, की त्याने वासूनाक्यावर जर काही कारवाई केली तर ती अन्याय्य आणि अविचाराची होईल. वासूनाक्याकडे कलात्मक आणि वाङ्मयीन दृष्टीने कसे पाहावयाचे ते फक्त ह्या अडाणेश्वरांनाच माहीत! मग शौचकूपाकडे कलात्मक आणि वाङ्मयीन दृष्टीने का पाहू नये बरे?  ह्या गचिच्छ चोपड्यावर कायदेशीर कारवाई महाराष्ट्र सरकार काय करील ते काही आम्हाला माहीत नाही. कारण, सरकारच्या वाङ्मयीन सल्लागार मंडळींत दुर्गा भागवत किंवा अडाणेश्वर ह्यांचेच भाऊबंद घुसलेले आहेत. म्हणूनच गलिच्छ चोपड्यांना महाराष्ट्र सरकार सालोसाल पारितोषिके देते. झोपडपट्टींतल्या किंवा खालच्या थरांतल्या लोकांच्या जीवनाचे वास्तववादी वर्णन करण्याचा आव आणून लैंगिक महारोगाने सडलेले बरेचसे मराठी लेखक आजकाल अत्यंत बीभत्स आणि हिडीस लिखाण करून मराठी भाषेत नि साहित्यांत अक्षरशः मूत्र आणि विष्ठा कालवीत आहेत. अशा त्या लिखाणाचा बहुसंख्य सभ्य आणि सुसंस्कृत मराठी जनतेने शक्य त्या उपायांनी नायनाट करावा हाच इशारा तिला आम्ही देतो.
***
(दै. मराठा, अग्रलेख, दि. २४ एप्रिल १९६६)

3 comments:

  1. Mr. Vinayak Pandit commented on a post which is now removed, so the comment is posted here-

    दोन्ही लेख इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद! या लेखांबद्दल इतरत्र वाचायला मिळाले होते पण काही कारणाने प्रत्यक्ष लेख माझ्याकडून वाचले गेले नव्हते.
    पहिल्या वाचनात तेंडुलकरांना नक्की काय म्हणायचे आहे ते कळले नाही.तो माझ्या समजुतीचा दोष असू शकेल.
    अत्र्यांनी वासूनाका किंवा त्याआधीच्या रथचक्र, चक्र, कोसला इत्यादी सगळंच पूर्णपणे नाकारलेलं दिसतं.थोडासा, व्यक्तिगत जीवन आणि साहित्यात नेहेमीच फरक करायला पाहिजे असा त्यांचा विचार माझ्या अल्पमतीला जाणवला.
    अलिकडे एका नामवंत प्रकाशनसंस्थेच्या स्वत:च्या प्रकाशनांचा प्रचार करणार्‍या मासिक चार-सहा पानी मुखपत्रात एका युवा लेखक-नाटककाराने लिहिलेली काही लक्षणे दरमहा प्रसिद्ध होत होती.त्यात कुतुहल त्याला काय वाटले किंवा त्या प्रकाशनसंस्थेला काय वाटले आणि ते काहीतरी विशेष म्हणून का छापले गेले हेही मला कळले नाही.
    सारांश, वेगवेगळे लेखक, वेगवेगळं लिखाण, त्यावर मतमतांतरे, उचलून धरणे आणि स्वयंघोषित सेन्सॉरशीप लादणे इत्यादी होत रहाणं हा साहित्यप्रवाहाचा भागच आहे असं वाटतं.आभार.

    ReplyDelete
  2. वासूनाका वद्दल मतेमतांतरे आज हि आहेत परंतु वरील अग्रलेखात दुर्गा भागवता बद्दल अत्रे जे काही लिहितात ते म्हणजे 'वासुनाक्या'च्याच तोडीचे किंवा त्यापेक्षाही जास्तीचे

    ReplyDelete
  3. वासूनाका वद्दल मतेमतांतरे आज हि आहेत परंतु वरील अग्रलेखात दुर्गा भागवता बद्दल अत्रे जे काही लिहितात ते म्हणजे 'वासुनाक्या'च्याच तोडीचे किंवा त्यापेक्षाही जास्तीचे

    ReplyDelete