Showing posts with label criticism. Show all posts
Showing posts with label criticism. Show all posts

Wednesday, July 7, 2010

बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर

- दुर्गा भागवत

भाऊ पाध्ये यांची ही कादंबरी 'वासूनाक्या'हून अगदी वेगळ्या प्रकारची आहे. या कादंबरीत एकप्रकारची वेगळीच गती आहे. पण ती गती धावेसारखी व त्यातल्या त्यात वाटोळ्या धावेसारखी आहे. वाटोळी धाव घेरी आणणारी असते. हीच भावनेच्या अकाल सुसाट धावेनंतर येणारी ग्लानी भाऊ पाध्ये यांच्या कलामनाने अचूक हेरून तिचे आलेखन केलेले आहे.

अवनायकी कादंबरीत नायक असतो व नसतोही. अशा कादंबरीचे तंत्र कथानकप्रधान अगर पात्रप्रधान कादंबरीप्रमाणे ठरीव साच्यातले नसते. तरीपण एक अतीव शब्दातीत वैफल्य अशा कादंब-यांत हमखास आढळते. ते कलात्मक झाले तर त्या कादंबरीला तंत्र व आत्माही लाभतो. ती कलात्मकता तसूभर जरी ढळली तरी कादंबरी आकाराला येत नाही. मग राहातो तो फक्त योगायोगाने उत्पन्न झालेल्या घटितांचा कंटाळवाणा तपशील. भाऊ पाध्ये यांच्या या कादंबरीचे तंत्र तिच्या त्या तिरक्या पण वर्तुळाकार गतीत आहे, असे मी प्रारंभी म्हटले; परंतु ही आंधळी गती भावात्मक गती नव्हे, तर गतीचा आभास आहे, असे म्हटले तर ते जास्त योग्य होईल. आभास निर्माण करण्यास भावात्मक सत्याच्या आविष्कारापेक्षाही अधिक जाण लागते. ही जाण जीवनाच्या कलांपासून आपण सदाचेच व ही वंचना परिस्थितीने नव्हे तर आपल्यातल्याच आंतरिक पोकळीने निर्माण केलेली असते, हे विसाव्या शतकार्धानंतरच्या काळात नागर शिक्षिताला आपली नैतिक नपुंसकता जाणवल्याचे चिन्ह आहे व ते सत्य बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकराच्या जीवनातल्या दोनतीन वर्षांपेक्षाही कमी काळातल्या घटनांतून कादंबरीकाराने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भावात्मक व्यक्तिमत्त्व रेखाटणे फार कठीण असते. माणसातला बदबदीतपणा त्याच्याच तोंडून सत्य स्वरूपात वदवणे हे खचित सोपे नव्हे. आतापर्यंत जुन्या वळणाच्या कादंबरीत व्यक्तीला दुष्ट-सुष्ट तरी ठरवले जात असे किंवा सामाजिक उणिवांमुळे व्यक्तीचे बलिदान होऊन, माणूस दोषाकडे झुकत जातो, असे तरी मानसशास्त्रीय गणित असे. साहित्यिक न्यायदान या ना त्या रीतीने बरेचसे कथालेखक करीतच असतात. स्खलनाच्या कल्पनाबंधाला या बाबतीत फार महत्त्व असते. परंतु या कादंबरीत स्खलनाचे स्थान गौण आहे. फक्त लौकिकदृष्ट्या अनिरुद्धाच्या स्खलनाचे नाटक रचले गेले आहे. इथे आभासाच्या द्वारे वास्तवाला अवास्तव, व अवास्तवालाही साफ होमून शेवटी विफलतेची राख शिल्लक ठेवून, कायमच्या वर्तमानाच्या गूढ आवरणाचा पडदा पाडून अनिरुद्ध आपल्या नजरेआड होतो. मरून माणूस चितेत अगर थडग्यात जातो तेव्हा आपले त्याच्याबद्दलचे कुतूहल संपते. बायकोला कायमची टाळण्याच्या निमित्ताने अनिरुद्ध चालत्या गाडीतून उडी टाकतो. इथेच कादंबरी संपते. पण शेवट इतका झपकन आणि अचानक येतो की तो अनिरुद्धाचे आयुष्य न तोडता त्याच्या जीवनाचे स्वारस्यच कायम तोडतो असा भास निर्माण करतो. एकेरी अचानक व विपरीत घटना या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक घटनेच्या शेवटी एक धक्का येतो. तो धक्का अनिरुद्धाला बसत नाही. तो बसतो इतर पात्रांना व त्यामुळेच वाचकाला. हेच अनिरुद्धाच्या अनिरुद्ध सूत्रबद्ध भग्नतेचे दर्शन या कादंबरीत घडते.

या भग्नतेची कारणे आहेत; प्रत्येक भग्नतेला कारण असते, त्याप्रमाणेच. अनिरुद्ध दुबळा आहे हे उघडच आहे; पण त्याच्या दुबळेपणातही एक जिद्द आहे. त्यामुळे आपण त्याची कीव करू शकत नाही की त्याला वाखाणू पण शकत नाही. दुबळ्या व्यक्तीच्या आयुष्यात योगायोगाला फार महत्त्व असते, नव्हे ते आपोआपच येते. जिथे नायक दुबळा तिथे परिस्थिती बलवत्तर हे ठरलेलेच असते. माणूस व परिस्थितीचा संघर्ष दाखवताना अनेक घटना योगायोगानेच घडत असतात. पण त्या घटनेची सूत्रे व्यक्तींच्या परस्परसंबंधांतून अगर काही अपरिहार्य बाह्य कारणांमुळे निर्माण झालेली असतात. परिस्थितीसापेक्षत्व व परिस्थिती-संघर्ष या दोन्ही तंत्रांचा वापर कादंबरीकार बहुश: सढळपणे करता. पण भाऊ पाध्ये यांनी आभासाचे जे आगळे तंत्र वापरले आहे त्यामुळे या दोन्ही तंत्रांच्या सीमारेषेवर फार धूसरपणे कथावस्तू म्हणजेच अनिरुद्धाचे जीवन हेलकावते आहे. पण नवल हे की, हा हिंदकळा जाणवत असूनही अनिरुद्ध, आपल्यात जे स्थिर जीवनाचे भान तयार होते आहे, त्याला जपण्यासाठी सारे काही अशाश्वत, फोलपट समजून ते सुखाने सोडतो आहे. अर्थात हे त्याचे सुटे होणे अध्यात्मिक पातळीवरचे नाही हे खरे; तरी पण माणसाच्या जाण समजाच्या नि स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाच्या मुक्ततेच्या ध्यासाचे द्योतक खचित आहे. या कादंबरीची सुरुवात या मुक्ततेच्या धडपडीपासूनच होते नि शेवट चालत्या गाडीतून टाकलेल्या उडीत होतो. मुक्ततेची धडपड तीव्र असावी लागते. ही तीव्रता थोडक्यात घटनांचे निवेदन करण्यात आणि तेही अती अलिप्तपणे केल्यानेच प्रतीत होते.

हे संक्षेपी पण साक्षेपी लेखन भाऊ पाध्ये यांना जमले आहे. त्यामुळे गतिमानतेची जाणीव कुठेही भंगत नाही. कादंबरीची सुरुवातच भ्रमनिरासापासून झालेली आहे. पहिला व्यावसायिक सिद्धीचा. केसमध्ये अपेश अनिरुद्धाने जणू मुद्दाम घडवून आणलेले असते. दुसरा भ्रम पत्नीप्रेमाचा. कॉलेजातल्या सुंदरीवर कुणीही प्रेम करतो नि पैसेवाल्या हुशार पोरावर पोरी भाळतातच. पण व्यवहारी स्त्रिया असा भ्रतार मिळाला की चारी बाजूंनी व्यवहाराचे खोल खंदक खणून त्या त्याला अनेक संमोहनांनी काबूत ठेवतात. बहुसंख्य नागर, शिक्षित महिलांची ही सवंग मनीषा असते; त्या मनीषेचे उत्कृष्ट उदाहरण अगदी रोजच्याच घडामोडी घेऊन प्रियवंदेच्या स्वरूपात लेखकाने दाखविले आहे. प्रियवंदा सार्वजनिक महत्त्वाकांक्षेने भारलेली नाही. तरी पण त्या हव्यासाचा सोस तिच्या सामाजिक व खाजगी जीवनाच्या प्रत्येक हालचालीत भाऊ पाध्ये यांनी कौशल्याने दाखवला आहे. प्रथमच नव-याला बायकोच्या बाबतीत आलेला थंडपणा हा लैंगिक पातळीवरचा नसून सांस्कृतिक आहे, हे लेखकाने आपल्या साध्या, संक्षिप्त आणि तरल पद्धतीने निवेदन केले आहे. व्यावहारिक दृष्टीने पाहिले तर अनिरुद्धाचे मन बायाकोवरून उडायला, घण बसल्यासारखे उडायला जे कारण झाले ते फारच क्षुल्लक. तिने गोड गळा असून संगीताचा रियाझ सोडला, हे कारण कला-संवेदनालाच उमगाणारे आहे. लैंगिक सुख तिच्याकडून भरपूर व खुशीने मिळणारे असूनही या धक्क्यापासून अनिरुद्धाने नव्हे तर त्याच्या आत्म्यानेच घ्यायचे नाकारले. शरीर आत्म्याचे ऐकू लागले. त्याचे मन म्हणू लागले, "हे तू लाथाड! धिक्कार!--- त्याच्या आहारी गेलास तर स्वत:ला विकशील- स्पर्श केलास तर आत्मा गमावून बसशील!"

वकिली सोडण्याची घटना आणि कारण देखील अगदी थोडक्यात पण प्रभावीपणे लेखकाने मांडले आहे. 'निरागस' म्हणजे काय, हे भणंगपणाचे कुठलेही लक्षण त्यात येऊ न देता अगदी सामान्य माणसाच्या तोंडून योगायोगाच्या संकेताने मांडणे ही गोष्टच मुळी अपवादात्मक आहे. भाऊ पाध्ये यांनी अपवादाला श्रेष्ठ वास्तवाचे स्वरूप दिले आहे. आणि शिळी रांगोळी पुसावी तितक्या सहजतेने अनिरुद्धाने नाकारलेल्या व यद्दच्छेने स्वीकारलेल्या गोष्टी घोळ न घालता सरळ मांडल्या आहेत.

"अँबिशन्स- प्रगती- पुरुषाचं लक्षण- हे असलं भयंकर ती बोलते. म्हणून वैताग येतो. मी जबाबच देत नाही- मग, ती अधिकच चेकाळते." यात प्रियवंदा हीच अनिरुद्धाच्या मानसिक संघर्षाची पार्श्वभूमी झाली आहे; आणि ही पार्श्वभूमी लोकदृष्टया पूर्ण भावात्मक असूनही संपूर्ण अभावात्मक दाखवण्याचा कलात्मक प्रयत्न लेखकाचा आहे. अनिरुद्धाचे वडील हा प्रियवंदेच्या प्रतीकाचा पुरुषी टेकू. तितकाच गतानुगतिक; तितकाच दांभिक; पण व्यवहारी दृष्टीने पूर्ण निखोड असा.

या मानवरूपी पार्श्वभूमीशी मुकाबला करताना अक्षरश: सोंगाडी विनोद, व तोही अगदी बरड पातळीवरचा भाऊ पाध्ये यांनी वापरला आहे. अनिरुद्ध खोट्या मिश्या लावून व नकली पोशाख करून शेजारच्या बि-हाडात जातो. हशा पिकवतो. स्वत:चे हसे करून बायकोला व बापाला वैतागवतो. अशाच मिश्या लावून तो आयव्हीकडे जातो. पण तिथली प्रतिक्रिया वेगळी व खेळकर असते. तिथे ही गंमत गंमतच राहाते. पण गमतीतूनच पुढल्या विदारक घटना घडतात. हा विनोद भ्रमनिरास माणसाचे जे स्वरूप असते त्याच्या व्यावहारिक वृत्तीच्या विडंबनासाठी वापरलेला आहे हे उघड आहे.

आयव्हीला रायसाहेबांपासून गर्भ राहातो. पुढे जगाला तर राहोच, पण बापाला व बायकोला हे कर्तुत्व अनिरुद्धाचेच असा बावळट संशय येतो. पण हा काही त्याचे निराकरण करीत नाही. प्रथम वकिली सोडल्यानंतर वेळ जरा मजेत घालवावा म्हणून आयव्ही व क्लारा या दोघी मोलकरणीच्याच पेशातल्या, पण जरा शिकलेल्या अशा उनाड मैनांच्या सहवासात तो पत्ते खेळायला व मद्यपान करायला येतो. आयव्हीला गर्भपात करावा लागला तर ते घृणास्पद आहे, असे अनिरुद्धाला तीव्रतेने जाणवते, आणि प्रारंभापासून तिच्याबद्दल कुठलेही विशेष आकर्षण नसले तरी सामान्य स्नेहाच्या भूमिकेवरून तो तिचे मायावी नवरेपण नाकारतो. प्रियवंदेला मूल नसते, पण म्हणून हा मुलाच्या लालसेने आयव्हीला मदत करतो असेही नव्हे. पण तिला घेऊन तो सरळ मनमाडला चक्रपाणीकडे जातो. तिथे आयव्ही इस्पितळात बाळंतपणात मरते.
"प्रत्येक माणसाचं प्रेत मला असंच उद्ध्वस्त करत आलं आहे." असं म्हणतो. हे उद्गार फार बोलके आहेत. आयव्हीसारख्या अडचणीत सापडलेल्या गरीब मुलीला मदत करणे यात कुठलाही पुरुषार्थ आहे असे तो मानीत नव्हता. त्याचा उद्देश एवढाच की, केवळ अशाच कृत्यांनी विचारांचे निरर्थक कल्लोळ शांत होतील, "डोक्यातली विचारचक्रं थंड होतील. क्षणभर डोक्यात काहीच असणार नाही. कसलाच विचार, कसलीच जाणीव, कसलीही स्मृती- काही नाही. सारं रिकामं असेल- अगदी मशिदीच्या डे-यासारखं. सारं शून्य असेल-खोल-खोल- अंधारासारखं. अशा गूढ संवेदनांच्या अनुभूतीसाठी मी हपापलेला असतो. बाकी सगळा फालतूपणा. . . ." हाच अंधार आगगाडीतून उडी टाकलेल्या क्षणी त्याला गवसला. अनिरुद्धाच्या मनोरेखनातले हेच असाधारण यश.

तांत्रिकदृष्ट्या पाहिले तर चक्रपाणीची बायको, जनार्दन वगैरे पात्रे व त्यांच्याबद्दलचे निवेदन निरुपयोगी वाटते. जनार्दनाचे आयव्हीच्या मृत्यूनंतरच्या वागण्याचे वर्णन 'सानेगुरुजी टाईप' झाले आहे. जनार्दन पुढे प्रियवंदेबद्दलच्या, ती आई होणार असूनही कायम टिकलेल्या स्वत:च्या नावडीत, सामील करण्यापुरता उपयोगी पडतो. वेडा खरा शहाणा व शहाणा खरा वेडा असतो, हे तंत्र आता फारसे नवे राहिलेले नाही. हे टाळता आले असते व त्यामुळे कथानकात वैगुण्य राहिले नसते.
 
या कादंबरीचा गुण म्हणजे तिचे पूर्ण आधुनिकत्व. आधुनिकाची नाडी पकडण्यात भाऊ पाध्ये यशस्वी झाले आहेत.
***
(दुर्गाबाईंच्या 'आस्वाद आणि आक्षेप' या 'डिंपल पब्लिकेशन्स'ने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून.)

पूर्वप्रसिद्धी: सत्यकथा, ऑक्टोबर १९६८.

वासूनाका

- दुर्गा भागवत

वासूनाका हा श्री. भाऊ पाध्ये यांच्या नऊ गोष्टींचा संग्रह आहे. मुंबईच्या कुठल्याही नाक्यावरच्या बकालपणाचा अतितीव्र उपहासाबरोबरच लेखकाला सहसा दुर्लभ असलेल्या निर्मम करुणेपोटी उद्भवलेल्या कथा वाचताना अंगावर शहारे येतात. या जगात जन्मतात, वाढतात, प्रजनन करतात आणि नंतर मृत्यूमुळे घाणीच्या प्रवाहातून कुठेतरी अज्ञातात फेकले जातात, अशा क्षीण व क्रूर, पाशवी वासनेने हतबल व हतबुद्ध झालेल्या जिवांच्या या कथा आहेत. मोठमोठ्या शहरात अनेक मोठमोठ्या सुंदर गोष्टी जन्म घेतात; पण तिथेच ठायी ठायी अशी डबकी असतात की त्यांची नैतिक दुर्गंधी समग्र नागर जीवनाला सदैव व्यापून टाकते. आतून लागलेली ही क्षुद्र जीवजंतूंची कीड कधीही कशानेही मारत नाही. इथे अब्रू फिरली तर लक्तरातच फिरते. मवालीगिरीच्या बरबटात ती अखंड वेडेचार करीत भटकत असते. वासनांच्या विचकट बुजबुजाटातून आपली सुटका होणार नाही हे तिला माहीत असते; आणि देव, धर्म, संस्कृती यांनी तर कायमची आपणाकडे पाठ फिरवलीच आहे. पंसाध्ये गृहस्थीपणाचे कामसुखही आपल्याला वंचित झालेले आहे. हे त्या अब्रूला कळते. ती आक्रंदते, सूडाने पेटते, फणकारते, फुत्कारते, पण हार होवो की जित अखेर ती अगतिक होऊन पडते; आपण मरणार नाही या जाणीवेच्या पोटी उद्भवलेली ती भयाण अगतिकता असते. आणि मग अनिर्बंध स्त्री-पुरुषसंबंधांभोवती वेडा पिंगा घालण्यापलिकडे तिला काही करण्यासारखे उरत नाही.

वास्तविक पहाता या कथांत एकच मूळ कल्पना आहे. ती म्हणजे पोरवयातच बिघडलेल्या माणसांच्या अतृप्त लैंगिक वासनेची. पोरसवदेपणाचा सारा निरागसपणा कधीच नाहीसा झालेला असतो. पण पिसाटपणे कशामागे तरी आसुसून लागण्याचा भाबडेपणा यातल्या प्रत्येक पात्रात आहे. वासनेच्या भुकेचे बळी आहेत सारे. वखवखलेले, मत्सरी . मूर्ख असले तरी त्यांना बरेवाईटातला फरक कळतो. लैंगिक वासना उत्तान असल्या तरी त्यांना अस्सल कमअस्सल बरोबर समजते. तसे पाहिले तर आपापल्यापरीने प्रत्येकच पात्र धूर्तपणे वागू पहाते. सदैव दुस-यावर मात करण्यास धडपडते, पण त्यांच्या कुणाच्याही धडपडीला काही यश येत नाही. जिथे यश येते तिथेच उदंड वैताग माजतो. वासना व वैताग यांची सांगड आडदांड, व्यसनी, बेशिस्त, बेजबाबदार पुरुषांच्या पात्रात तर बेमालूम पडली आहे. हे सारे पुरुष उंडगे म्हणजेच मनाचे दुबळे आहेत, आणि वरकड उद्दामपणा आणि दुस-याच्या अब्रुनुकसानीचे सवंग शस्त्र परजून आत्मसंरक्षण करण्याखेरीज त्यांना गत्यंतरच नसते. अर्थात ही दोन्ही हत्यारे वापरण्यास टोळीचे जीवन हवेच. पण ही टोळी धाडसी दरवडेखोरांची संघटित उद्दिष्ट असलेली टोळी नव्हे, तर नुसते टोळके आहे. हे लोक चोरबीर नाहीत, राजकीय आकांक्षा असलेले गल्लोगल्लीतले गुंड नाहीत; ते दारुडे, व्यसनी व बीभत्स चलनी भाषा बोलणारे आहेत. टिर्रेबाजी हेच त्यांचे लोकांना जरब बसवण्याचे तंत्र आहे. आणि जमावाने केलेली टिर्रेबाजी भीरू लोकांच्या बाबतीत किती घातक होते याचे चित्रण या कथांत केलेले आहे. अशा कुठलीही आंकाक्षा नसलेल्या पोकळ माणसांची पोकळ घमेंड फक्त चरबट, गोब-या, राठ भाषेत व्यतीत होते. आणि तेच हे बरळ भाषेचे स्वरूप पोकळ व्यक्त्तित्वातून एकत्र होऊन सामाजिक ठाण मांडून बसते. ते ठाण म्हणजेच हा वासूनाका. ते सामाजिक एकत्रीकरण म्हणजेच हे अत्यंत शिथिलतेवर, पण सदाच टोळक्याच्या स्वरूपात आढळणारे, पोक्याच्या शत्रू-मित्र मंडळ. या टोळक्यात आज शत्रू तो उद्या मित्र व आजचा मित्र तो उद्याचा शत्रू होतो. आणि नवल हे की, या मर्यादाही फार पुसट असतात. फिरून रागलोभ एकत्र होऊन या व्यक्ती टोळक्याच्या परिघातच अखंड वावरतात.

या कथांचा परीघ वासूनाक्याचा. म्हणजे हमरस्त्यावरील अड्ड्याचा, म्हणजेच पुरुषपात्रांच्या निरर्गल संचाराचा. हा संचार शारीरिक तर आहेच, पण मानसिकदेखील आहे. नव्हे, अधिक मानसिकच आहे. वासनांच्या डोंबात, शरीर दृष्ट्या मामू, पोक्या, चम्या, टण्या केव्हाच जळून खाक झालेले आहेत. पण मनाची धुगधुगी मात्र त्यांच्यात आहे. आणि हीच धुगधुगी लेखकाने या पात्रांच्या जिवंतकळेच्या चित्रणासाठी वापरलेली आहे. धुगधुगी म्हटली की कुठेतरी आशेचा ताणतणाव आलाच. वासनाच मुळी आशारूप आहे. पण त्या वाह्यातांची आशा, त्यांच्या माणुसकीची जिवंत खूण कशात आहे? द्रव्यात नाही, भोगात नाही. भोग फक्त त्यांचे शरीर भोगते आहे आणि रोज अनावर चिडीने आदल्या दिवशीच्या भोगांचा सूड दुस-या दिवशी दुप्पट होऊन मिळवण्याचा आटापिटा करते आहे. भोग ही ह्यांची गर्ता आहे. तिथे आनंद नाही, प्रेम नाही, शांती नाही. पण ह्या टग्यांच्या रितेपणात जो हिरवा तळ आहे, त्याच्यातून त्यांनी एक गंधर्वसृष्टी निर्माण केलेली आहे. या गंधर्वसृष्टीत फक्त एकच गोष्ट आहे : स्त्री. तरुण अप्सरेसमान स्त्री, पतिव्रता स्त्री. यांच्यासारख्या बाहेरख्याली माणसाशी ती कुठलाच संबंध ठेवीत नाही. ती स्वच्छ असते. अंतरबाह्य स्वच्छ. बोलते गोड. यांच्याशीही. रहाते छानशा बाहुलीच्या घरात. रमते फक्त पतीत. अशीही चिरतरुण गृहिणी-मोहिनी त्या टोळक्याच्या सामुदायिक मनात स्वप्नाप्रमाणे वागत असते. पुराणातल्या कथेप्रमाणे या कथेला हे सारे गणंग अगदी हिरकणीप्रमाणे जपतात. ते एक त्यांचे पार्थिव पूजास्थान असते. सामाजिक नीतीच्या मूल्याचे प्रतीक म्हणजे पतिव्रता बायको. ती आपली नव्हे तर दुस-या कोणाची तरी, असा तिरपागडा नीतीचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. नैतिक पावित्र्याची भावना आली की, मग तिचा पुरस्कारही आलाच. मन:स्वर्गातली पतिव्रता नार मग साहजिकच हे अवतीभोवती पंचक्रोशीत शोधतात. प्रत्येक तरुणीची छेड काढून आपापल्यापरीने अचकटविचकट चाळे करून तिची परीक्षा घेतात. आणि सगळ्या वासूनाक्यावरच्या पोरी ते निकालात काढतात. नुकताच वयात आलेला पोरगा जसा स्त्रीभोवती मनाने पिंगा घालतो तसेच हे कायम घालीत रहातात. त्यांचे मानसिक वय पौगंडदशेपलिकडे पोचतच नाही मुळी. आणि या कायम पौगंडावस्थेमुळे अशी स्त्री दिसली की आपला विश्वास तिच्यावर टाकून ते तिला मोठ्या अदबीने वागवतात. बायजी ही पदवीधर तरुणी ही अशीच आदर्श नारी त्यांच्या मते होती. आणि जेव्हा बायजी विधवा झाल्यानंतर चळल्याचे त्यांना कळते तेव्हा त्यांच्यामधले सारे नैतिक स्वप्नाचे अवसान गळून जाते. एखाद्या मूर्तिभंजकाप्रमाणे ते मग तिच्यावरच तुटून पडतात; हा चेव त्यांच्यात होता. कारण स्त्री-पुरुषांच्या सर्वांगपूर्ण मीलनात जीवनाचे परम सार्थक आहे असा त्यांचा भोळा भाव होता. हे सारे टारगट वाह्यात बायकांच्या बाबतीतच लालसा धरणारे होते; पतिव्रतेला भिणारे होते. ते उन्मार्गी असले तरी वाममार्गी नव्हते. समसंभोगी नव्हते, दणकट पौरुषाची ग्वाही म्हणजेच पतिव्रता सुंदरीचे इमान असे गणित त्यांच्या मनात भिनलेले होते. आणि त्यांच्या वासना मोकाट व अतिरिक्त असल्या तरी त्या विकृत नव्हत्या असे या संदर्भात म्हणता येते. स्त्रीत्व हे त्यांच्या लैंगिक जाणिवेचे एकमेव प्रतीक आहे; आणि तारुण्य, सौंदर्य, चारित्र्य व प्रेमळपणा या चार गुणांचा साज त्यांनी आपल्या मनाने या पूज्य वस्तूभोवती चढवलेला आहे. ही वस्तू पूज्य आहे, कारण अचेतन पुरुषमानसात स्त्रीत्व हे एक अनाकलनीय रहस्यमय रूप घेऊन वावरत असते. पूजा, प्रेम व द्वेष या तीन भावनांनी ह्या रहस्याचा वेध घेण्याचा प्रयत्न पुरुष करतात. स्त्रीत्व म्हणजे निर्मितीचे गूढ, सा-या ब-यावाईटाचे शारीरिक व मानसिक जनन स्त्रीत अभिप्रेत असते; आणि म्हणूनच स्त्रीत्वाची मनधरणी होते व अति दारुण निंदाही होते. विशेषत: जे जग केवळ पुरुषांचेच आहे, तिथे पूजा व तिरस्कार या दोनच भावना मुख्यत्वे आढळतात. ग्रीक संस्कृती पूर्णपुरुषी असल्यामुळे तिथे स्त्रीला अतीव गौण स्थान प्राप्त होऊन पुरुषच पुरुषाचा आराध्य विषय बनला आणि समसंभोगाला त्यांच्या तत्त्वज्ञान, साहित्य व कलांत एक वेगळाच आकार प्राप्त झाला. पण वासूनाक्यावरचे टोळके तसे भारतीय सनातनी परंपरेचे आहे. माता व प्रेयसी या दोन रूपांत ते स्त्रीला मानतात. पोक्या देखील आपल्या आईचा उल्लेख करतो तेव्हा ती म्हणेल ते ते मंजूर करतो. ककीशी प्रेमाचे चाळे केले तरी लग्न आईने ठरवलेल्या मुलीशीच करतो. आणि बायकोबद्दल ब्रही काढत नाही. ती त्याची अगदी खाजगी गोष्ट आहे. वासूनाक्यावर तिची चर्चा मुलीच होत नाही. अर्थात वासूनाक्यावरच्या या बेताल पुरुषांनाही स्त्रीत्वाच्या अदीम रहस्याचे अनामिक भय वाटत होते; भयाची भावना जी जी बीभत्स रूपे घेऊन, जितक्या राठ व पुनरावृत्तीच्या भाषेत प्रकट होते तितकी कुठलीही भावना प्रकट होत नाही. आणि त्यात भीतीचा विषय लैंगिक असला म्हणजे बोलायलाच नको. मग ती विकृतीच होते. वासूनाक्यावरच्या कथांत जी विकृती चित्रित केलेली आहे ती या भीतीची आहे.

इष्क या गोष्टीत मामू या वालपाखाडीतल्या दादाचे चित्र आहे. बाकीच्या गोष्टीत मामू अधिकारी आहे. मवाल्यांच्या शिस्तीत व नीतीत कुठे एवढासा फेरफार झाला तरी त्याला खपत नाही. बायकांच्या बाबतीत देखील त्याची मिजास और आहे. हा या टोळक्याचा नायक आहे म्हणा ना! पण इष्क या कथेत मामूचे खरोखरच जेव्हा भानूवर प्रेम बसते आणि ती छचोर मुलगी पुढे लग्न करून त्याच्या तोंडाला पाने पुसते, तेव्हा काही मामू तिचे पूर्वचरित्र सांगून तिचा संसार उधळीत नाही; उलट तो या प्रेमभंगाने घायाळ होऊन अक्षरश: वेडा होतो. वेडातही ती दिसली तेव्हा तोंड खाली घालून तिची ओळखही न देता तो निघून जातो. मामूच्या या वर्तनाचे आश्चर्य भानूलाही वाटते. तिला ते एक प्रकारे लागते. व त्याचे वेडे खोटे आहे हे ती शाबीत करू लागते. आपल्यामुळे त्याला वेड लागले या वंचनेच्या आरोपासाठी भानू जी केविलवाणी धडपड करते ती धडपड मामूच्या वेडाहूनही अधिक बापुडवाणी आहे.

आवाज या कथेत बदफैली बाबल आपल्या दुसरेपणाच्या बायकोचा आपल्या मुलांशी संबंध आहे असा संशय घेऊन घरादाराला हैराण करतो. पुढे त्याची बायको वैतागून घर सोडते व कुंटणखाना करते. पोक्या या कुंटणखाण्यात तिला भेटल्यावर ती मनीचे शाली भडभड बोलते. नव-याने रखेलीसमोर आपल्याला 'आई' म्हटले हेच तिचे महान दु:ख असते.

मेहमान या कथेतला बावळट टण्या हा वासूनाक्याच्या मवालेगिरीचा सर्वात मोठा बळी आहे. बापा घरून भानगड करून तो पळतो व पोक्याचा आश्रय घेतो. एकामागून भानगडी तो करतो व प्रत्येक भानगड त्याच्या अंगाशी येते. मवालीगिरीचे तंत्रमंत्र त्याला अवगत नसतात. त्याच्या निमित्ताने मामू वगैरे सर्वच जण त्याला आपल्या नीतीचे व शहाणपणाचे घोट पाजतात. शेवटी मामूने त्या भोळ्या पोरावर आपल्याच पोरीच्या नादात त्याला गुंगवून त्याचा फजिता केला, तेव्हा बायकांच्याबद्दल मनोमनी संशय ठेवून त्यांच्याशी खेळ करण्यात काहीसे यश संपादन केलेल्या बाकीच्या मंडळीहून अलग पडतो. तनामनानेच पागल होतो. बाकीचे तरतात. शेवटी हे ओळखून टण्या वैतागतो व या मवाल्यांची सांगत कायमची सोडून बापाकडे परत जातो. या टोळक्याच्या मवालीगिरीवरचे सर्वात यशस्वी टीकाभाष्य याच कथेत आहे. ही कथा वाचल्यावर लेखकाची शैली व कथावस्तू यातला एकजीवपणा लक्षात येतो.
***
(दुर्गाबाईंच्या 'आस्वाद आणि आक्षेप' या 'डिंपल पब्लिकेशन्स'ने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून.)

पूर्वप्रसिद्धी: सत्यकथा, मार्च १९६६.